Friday, October 26, 2007
महाराणी
भारताच्या राजकारणामध्ये घराणेशाही आहे, असे नेहमीच म्हटले जाते. या घराण्यांची यादी केली, तर पहिल्या मोजक्यांमध्ये समावेश होईल तो ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा. स्वातंत्र्यानंतर देशातील अनेक संस्थानिकांनी राजकारणामध्ये प्रवेश करून सत्ता टिकविण्याचा प्रयत्न केला. काहींना यश आले, काहींना अपयश. शिंदे घराण्याने मिळविलेले यश मात्र दुसऱ्या कोणत्याच घराण्याला मिळाले नाही. शिंदे घराण्याची तिसरी पिढी आज भारताच्या संसदेमध्ये आहे, तर दुसऱ्या पिढीचे सर्वच सदस्य कोणत्या ना कोणत्या सभागृहामध्ये आहेत. यातील एक आहेत, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे. गेला आठवडाभर राजस्थानात गुजर आणि मीणा यांच्यातील संघर्षाने पेट घेतला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनांचे पालन करावे, म्हणून गुजर समाज आता हटून बसला आहे आणि त्यातच पक्षातील ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांच्यासारख्यांनी हल्ला चढविल्यामुळे वसुंधराराजे चक्रव्यूहात सापडल्या आहेत. अर्थात अशी वादळे आणि संघर्ष त्यांना नवीन नाही. अगदी लहानपणाचा काही काळ सोडला, तर सातत्याने संघर्ष करीतच त्यांनी वाटचाल केली आहे. प्रारंभी आपल्या भावाबरोबर, त्यानंतर काही काळ पतीबरोबर आणि राजकारणामध्ये उतरल्यानंतर विरोधकांपर्यंत संघर्ष करीतच त्यांनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येण्याचे भाग्य ज्या काही मोजक्यांना लाभते, अशांपैकी वसुंधराराजे एक. स्वातंत्र्यानंतर तब्बल सहा वर्षांनी जन्म झालेल्या वसुंधराराजे यांचे बालपण मात्र ग्वाल्हेरपेक्षा पुण्या-मुंबईतच अधिक गेले आहे. त्यानंतर शालेय शिक्षणासाठी कोडाईकॅनालच्या कॉन्व्हेंटमध्ये त्यांची रवानगी झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाले असले, तरीही संस्थानिकांच्या घरातील शिस्त, रीतीरिवाज पाळण्यातच त्यांचे लहानपण गेले. त्यामुळे सुटीमध्येही ग्वाल्हेरला जाण्यापेक्षा मांजरी येथील स्टडफार्मवर राहणे त्यांना आवडे. मुंबईच्या सोफिया कॉलेजमध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रमध्ये पदवी संपादन करीत असतानाच, त्यांच्या आई आणि ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या पुढाकाराने त्यांचा विवाह झाला. धोलपूरचे राजे हेमंतसिंग यांच्याशी करण्यात आलेली सोयरीक जेमतेम सहा वर्षेच टिकली. 1978 मध्ये वसुंधराराजे पुन्हा आपल्या आईबरोबर राहू लागल्या. दुसऱ्या बाजूला विजयाराजे आणि त्यांचे चिरंजीव माधवराजे यांच्यातील मतभेद टोकाला गेले होते. या मतभेदांमध्ये विजयाराजे यांच्या बाजूने वसुंधराराजे उभ्या राहिल्या. याच दरम्यान विजयाराजे यांनी आपला नातू दुष्यंतसिंग याला धोलपूरच्या राजसंपत्तीतील वाटा मिळावा, यासाठी दावा दाखल केला होता. या सगळ्यामुळे वसुंधराराजे यांचा बहुतांश वेळ न्यायालयातच जात होता. भारतीय जनता पक्षाचे 1984च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पानिपत झाले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यालाही ग्वाल्हेरमधून माधवराव शिंदे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्याच वेळेस विजयाराजे यांनी आपली राजकीय वारसदार म्हणून वसुंधराराजे यांना राजकारणात उतरविण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी भारतीय जनता युवा मोर्चाचे काम सुरू केले. मध्य प्रदेशच्या राजकारणात माधवराव शिंदे आपल्या बहिणीला वाढून देणार नाहीत, हे लक्षात घेऊन विजयाराजे यांनी 1985मध्ये वसुंधराराजे यांना राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीसाठी झालवाडमधून उमेदवारी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. 1989मध्ये त्या खासदार झाल्या. पुढे भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत आले. त्या वेळेस वसुंधराराजे यांचा मंत्रिमंडळातील समावेश ही केवळ औपचारिकता होती. अनेक महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आली. पंतप्रधानांच्या कार्यालयापासून ते परराष्ट्र मंत्रालयापर्यंत सर्वच ठिकाणी काम करताना, त्यांना प्रशासन कसे चालवायचे असते, याचे जणू प्रशिक्षणच मिळाले. त्यातच वाजपेयी, जसवंतसिंग यांच्यासारख्या मुरब्बी नेत्यांकडून राजकारणातील डावपेचही त्या बारकाईने शिकल्या. 2002च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मध्य प्रदेशमध्ये उमा भारती, तर राजस्थानमध्ये वसुंधराराजे याच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील असे जाहीर केले. संपूर्ण प्रचार यंत्रणा त्यांच्या भोवती फिरेल, याची काळजी घेण्यासाठी प्रमोद महाजन आणि अरुण जेटली यांच्यासारखे नेते झटत होते. वसुंधराराजे यांनीही आपली महाराणीची "हाय प्रोफाइल' व्यक्तिरेखा बदलून सामान्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर भाजपला राजस्थानमध्ये अभूतपूर्व यश मिळविले. भैरोसिंह शेखावत यांच्यापेक्षाही मोठे यश मिळविलेल्या वसुंधराराजे यांनी या निमित्ताने आपल्यावर असलेला "बाहेरचा उमेदवार'ही प्रतिमाही बदलण्यात यश मिळविले. राजस्थानला पर्यटकांचे आकर्षण ठरविण्यापासून ते राज्यामध्ये परकीय गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये वसुंधराराजे यांनी लक्ष घातले आहे. मात्र, या काळातही त्या वादांपासून दूर राहिलेल्या नाहीत. "अन्नपूर्णे'च्या वेषात त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध होणे असो वा उद्योजक किरण मुजुमदार यांच्याबरोबरील चुंबनाचे छायाचित्र; किंवा राजस्थानच्या कपड्यांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी थेट रॅम्पवर चालून फॅशन शोमध्ये घेतलेला त्यांचा सहभाग, प्रत्येक वेळेला वादळ उठते. मात्र, आजपर्यंत प्रत्येक वेळेस त्या खंबीरपणे त्याला सामोरे गेलेल्या आहेत. "माझे चुकले' किंवा "मला असे म्हणायचे नव्हते' असे सांगून त्यांनी या प्रकरणापासून पळ काढलेला नाही, तर ही वादळे अंगावर घेऊन आपल्या विरोधकांशी सामना केला आहे. सध्या सुरू असलेला वादही असाच आहे. त्यातूनही त्या तरतात की खुर्ची गमावतात, याचे उत्तर येणाऱ्या काही दिवसांतच मिळेल. पराग करंदीकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment