Tuesday, March 11, 2008

एस. एम. कृष्णा

कृष्णांची नवीन खेळी
------------------
पराग करंदीकर
parag.karandikar@esakal.com
-------------------
एस. एम. कृष्णा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा देऊन अखेर स्वगृही म्हणजेच कर्नाटकमध्ये परतत आहेत. गेली पंचेचाळीस वर्षे देशाच्या आणि कर्नाटकच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या कृष्णा यांना मुंबईतील तीन वर्षांची विश्रांती मानवली आहे. कर्नाटकमध्ये नजीकच्या काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा कॉंग्रेसची धुरा सांभाळण्याच्या दृष्टीने ते परतत आहेत. आतापर्यंतही त्यांचा मुक्काम मुंबईच्या राजभवनामध्ये असला, तरी त्यांचे सर्व लक्ष कर्नाटकच्या "विधानसौधा'कडेच होते.
कृष्णा यांचा राजकीय प्रवास अनेक चढउतारांचा आहे. मंड्या जिल्ह्यातील एस. सी. मलय्या यांचे कृष्णा हे आठवे अपत्य. आठवे मूल म्हणूनच त्यांचे नाव कृष्णा असे ठेवले गेले. घरची परिस्थिती उत्तम असल्याने सर्व मुलांना शिक्षण देण्याकडे त्यांच्या वडिलांचे लक्ष होते. म्हैसूरच्या महाराजा महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर तेव्हाच्या परंपरेनुसार ते कायद्याची पदवी घेण्यासाठी बंगळूरमध्ये आले. त्यानंतर अमेरिकेमध्ये जाऊन कायद्याचे उच्च शिक्षण त्यांनी घेतले. बंगळूरमध्ये शिकताना समाजवादी मित्रांमुळे कृष्णा राजकारणाकडे आकृष्ट झाले. 1962 मध्ये वयाच्या 32 व्या वर्षी मंड्या जिल्ह्यातील मड्डूर या विधानसभा मतदारसंघातून प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून ते भरघोस मतांनी निवडून आले. उत्तम व्यक्तिमत्त्व, प्रभावी वक्तृत्व आणि अभ्यासू वृत्ती या गुणांमुळे त्यांनी विधानसभेत चांगली छाप पाडली. 1968 मध्ये मंड्या लोकसभा मतदारसंघासाठी त्यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. त्या वेळी लोकसभेमध्ये दिग्गज नेते होते. नाथ पै, यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी यांसारख्या नेत्यांशी आपला स्नेह याच काळात जुळल्याचे कृष्णा आवर्जून नमूद करतात. राजकारणातील सभ्यता आपण त्यांच्याकडून शिकलो; इतकेच नव्हे तर विचारांची लढाई विचारांनीच केली पाहिजे, याची शिकवण याच सभागृहामध्ये मिळाल्याचे ते सांगतात. 1971 च्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले. मात्र, एव्हाना ते कॉंग्रेसच्या तंबूत दाखल झाले होते.
नंतर 1972 मध्ये इंदिरा गांधी यांनी त्यांना कर्नाटकमध्ये परतण्यास सांगितले. त्यांना विधान परिषदेत पाठविण्यात आले. वाणिज्य व उद्योगमंत्रिपदी त्यांची वर्णी लागली. मात्र, 1977 मध्ये ते पुन्हा दिल्लीत परतले. राष्ट्रीय राजकारणात वावरायचे की राज्याच्या, याचा निर्णय त्यांना घेता येत नव्हता. त्याचदरम्यान संयुक्त राष्ट्रसंघात पाठविलेल्या प्रतिनिधी मंडळात त्यांचा समावेश झाला. पाठोपाठ केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळाले. दिल्लीत चांगले बस्तान बसते आहे, असे वाटत असतानाच इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि पाठोपाठ लोकसभेची निवडणूक झाली. कॉंग्रेसला "न भूतो न भविष्यति' यश मिळाले; पण मंड्यामध्ये कृष्णा पराभूत झाले.
पुढची चार वर्षे कृष्णा यांच्यासाठी राजकीय विजनवासाची होती. राजीव गांधी यांच्याकडे त्यांना फारशी किंमत मिळत नव्हती आणि राज्याच्या राजकारणामध्येही स्थान मिळत नव्हते. 1989 मध्ये पुन्हा एकदा ते कर्नाटक विधानसभेमध्ये परतले. विधानसभेच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे देण्यात आली. सक्रिय राजकारणातून आपल्याला दूर ठेवण्यासाठीच कॉंग्रेसचे पक्षश्रेष्ठी हे करीत असल्याची त्यांची भावना तेव्हा झाली होती; पण 1992 मध्ये त्यांना उपमुख्यमंत्रिपदी बढती मिळाली. मात्र, 1994 च्या विधानसभा निवडणुकीत ते मड्डूरमधून पराभूत झाले. राजकीय कारकिर्दीत दुसऱ्यांदा त्यांनी "ब्रेक' अनुभवला. एप्रिल 1996 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. नंतरची तीन वर्षे त्यांनी खासदारकी करीत कर्नाटक कॉंग्रेसकडे लक्ष दिले. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळाले होते. राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन 1999 मध्ये त्यांनी मड्डूरमधून विधानसभा निवडणूक लढविली. ते आमदार झालेच आणि मुख्यमंत्रीही.
त्यानंतरचा पाच वर्षांचा काळ कृष्णा यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ होता. कर्नाटकमध्ये ते म्हणतील ती दिशा पूर्व होती. प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती झाली होती. देशामध्ये मंदीची लाट असतानाही माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि जैव तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रांसाठी कर्नाटकात पूरक वातावरण करण्यात कृष्णांनी यश मिळविले. परिणामी जगातून गुंतवणुकीचा ओघ बंगळूरकडे वळला. बंगळूरला देशाची "आयटी' राजधानी बनविण्यामध्ये कृष्णा यांचा सिंहाचा वाटा होता. याच कालावधीमध्ये त्यांच्या पाठिंब्याने बंगळूरमधील उद्योगपतींनी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी एक गट स्थापन केला. त्याची चर्चा देशभर झाली. मात्र, कावेरी पाणीवाटपावरून कृष्णा यांची भूमिका वादग्रस्त ठरली होती. तमिळनाडूने हा विषय सर्वोच्च न्यायालयात नेल्याने अखेर कृष्णांनी बिनशर्त माफी मागून सुटका करून घेतली. त्यामुळे स्वतःच्या जिल्ह्यातील जनमत त्यांच्या विरोधात गेले. अखेर निवडणुकीपूर्वी काही दिवस त्यांनी आपला मतदारसंघ बदलला आणि बंगळूरमधील चामराजपेठमधून निवडणूक जिंकली.
मात्र, 2004 च्या निवडणुकीत कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचे पानिपत झाले. जेमतेम 66 जागा मिळाल्याने कॉंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर गेला. त्याची शिक्षा म्हणून कृष्णा यांना थेट महाराष्ट्रात राज्यपालपदावर पाठविण्यात आले. त्यांच्या कारकिर्दीतील हा तिसरा ब्रेक ठरला. महाराष्ट्रातील त्यांची कारकीर्द फारशी चमकदार ठरली नसली, तरीही वाद टाळण्यामध्ये ते बऱ्यापैकी यशस्वी ठरले. महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील सीमाप्रश्‍नाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठीच कृष्णा यांची नियुक्ती झाल्याचा प्रचार ते येथे येताच सुरू झाला होता. त्या वादातून सहीसलामत सुटण्यात कृष्णा यशस्वी ठरले.
दररोज टेनिस खेळण्यासाठी आवर्जून वेळ देणाऱ्या कृष्णांचे राहणीमान हाही चर्चेचा विषय ठरतो; मुंबईच्या राजभवनामध्येही तो तसा ठरला. पण अतिशय सभ्यपणे त्यांनी या सर्वांना उत्तरेही दिली. रामकृष्ण हेगडे यांच्यासारख्या आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याविषयी भरभरून बोलणारे कृष्णा, देवेगौडा यांच्यासारख्या प्रतिस्पर्ध्याविषयी बोलणेच टाळतात. आतापर्यंत प्रत्येक "ब्रेक'नंतर कृष्णा यांनी कारकिर्दीतील नवीन टप्पा गाठण्यात यश मिळविले आहे. ही परंपरा ते कायम ठेवणार का, याचे उत्तर लवकरच मिळेल.

No comments: