Friday, October 26, 2007
पाऊणशे वर्षांचा मार्दवशील, उत्साहाचा धबधबा...
""महाराष्ट्रात सध्या चांगलाच सामना रंगतो आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला चांगली संधी आहे; पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस त्यांच्या सरकारच्या कामकाजाबाबत काहीच सांगत नाहीत. खरे तर त्यांनी काहीच केलेले नाही... येथपासून पंतप्रधानांना सांगूनही ईशान्येच्या राज्यांत काही तरी वेगळेच घडते आहे. वेळेवर त्याबद्दल उपाय योजले पाहिजेत...'' माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी संपूर्ण दिवसभरात वेगवेगळ्या वेळेस हे मुद्दे उपस्थित करीत राहतात. निमित्त असते, त्यांच्याबरोबर या प्रचार मोहिमेत संपूर्ण दिवस राहण्याचे. श्री. अडवानी यांच्या स्वभावाचे अनेक पैलू या संपूर्ण प्रवासात समोर येतात. वाचनात रमणारे, चालकाशी मोकळेपणाने संवाद साधणारे, सभेत हुकमी दाद मिळविणारे, आठवणींना उजाळा देणारे... असे अनेक पैलू. अगदी सकाळी पुण्यातल्या शासकीय विश्रामगृहात आपल्या पत्रकार परिषदेतील पत्रकाचा कच्चा खर्डा ते बारकाईने वाचत असतात. त्यातील काही चुका दुरुस्त करायला सांगतात आणि त्यानंतर सुरू होतो तो एक प्रचाराचा दिवस. आपल्या कक्षातून बाहेर पडताच, समोर पोलिस दल मानवंदना देण्यासाठी सज्ज असते; पण आदर्श आचारसंहितेमध्ये हे चालते का, असे विचारून श्री. अडवानी ही मानवंदना न स्वीकारताच बाहेर पडतात. पुण्यातील पत्रकार परिषदेत कॉंग्रेसच्या केंद्र सरकारवर कडाडून केली जाते. त्यानंतर लातूर-परळी-मुंबई दौऱ्याला प्रारंभ होतो. विमानात चढण्यापूर्वीच ते वैमानिकांशी आवर्जून बोलतात. प्रवासातील बारकावे समजून घेतात. विमानात चढल्यानंतर मात्र लगेचच आपल्या हातातील "सायकिक वॉर्स' या पुस्तकात रमतात. वयाची पंचाहत्तरी पार केलेले अडवानी यांच्या चेहऱ्यावर थकवा अजिबात नसतो. मध्येच कधी तरी चर्चा सुरू होते. महाराष्ट्रात यंदा नक्की काय होईल, असा उलटा प्रश्न करून त्याचे उत्तरही तेच देण्यास प्रारंभ करतात. "महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये सत्तारूढ पक्ष फक्त आमच्या केंद्र सरकारवर टीका करत आहे, स्वतः काय केले ते सांगतच नाही,' असे त्यांचे म्हणणे असते. दुसऱ्या बाजूला दहा तारखेला नागपूरला कसे जायचे, याची माहितीही त्यांना हवी असते. लातूरला विमान उतरते. शेजारी परळीला जाण्यासाठी हेलिकॉप्टर सज्ज असते; पण गोपीनाथ मुंडे दिसत नाहीत. लगेचच विचारणा होते, "मुंडेजी कहॉं है?' कोणी तरी सांगते, "ते मुंबईतून उशिरा निघालेत. तुम्ही पुढे चला; ते मागाहून येतील.' पण "मी हेलिकॉप्टरमधून गेल्यावर त्यांना हेलिकॉप्टर कोणते,' असा प्रश्न विचारून ते हेलिकॉप्टरमधून खाली उतरतात. इथेच वाट पाहण्याचा निर्णय होतो. उपस्थित पोलिस कर्मचारी व मोजक्या कार्यकर्त्यांची धावपळ उडते. एवढ्यात पुन्हा निरोप येतो व मुंडेंशिवाय परळीचा प्रवास सुरू होतो. या प्रवासात पुस्तक सोबतीला असतेच; पण मध्येच प्रचाराच्या काही मुद्द्यांचा कागद नजरेखालून घातला जातो. संवाद तसा कमीच होतो. परळीमध्ये श्री. मुंडे आल्यानंतर मात्र अडवानींचा चेहरा खुलतो. मुंडे नमस्कारासाठी खाली वाकताच त्यांना आलिंगन देत, "कैसे हो' म्हणून विचारणा होते. परळीच्या सभेत प्रारंभी मुंडे नेहमीच्या शैलीत भाषण करून टाळ्या घेतात. नंतर मात्र अडवानी आपल्या शैलीत कॉंग्रेसवर टीका करतात. "सोनिया गांधींना विदर्भाचे मागासलेपण दिसते; पण मराठवाड्याचे काय,' असा प्रश्न विचारला जाताच, उपस्थितांमधून जोरदार दाद मिळते. शेतकऱ्यांसाठी तुमच्या सरकारने काय केले, असे विचारल्यावर मिळालेली दाद सभा खिशात टाकल्याची पावती असते. एका कार्यकर्त्याच्या घरी जेवणासाठी विविध पदार्थ समोर येतात; पण अडवानींची पसंती असते ते डाळ-भातालाच. आग्रहाला हसून नकार देत, एकीकडे ते काही प्रश्नांना उत्तरे देतात. "भाजपच्या दुसऱ्या पिढीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपणार आहे,' असे म्हणताच, ते म्हणतात, ""हे सर्व तुम्ही पत्रकारांनी सुरू केले आहे. सहा महिन्यांपूर्वीच्या सहा वर्षे तुम्हाला फक्त अडवानी व वाजपेयी यांच्यातील मतभेद दिसत होते. आता आमच्याबाबत ओळही येत नाही. आता तुम्हाला आमच्या इतर नेत्यांमधील मतभेद दिसू लागले आहेत. यात खरेच काही नाही.'' जेवण संपल्यानंतर परतीचा प्रवास सुरू होतो. हेलिकॉप्टरपाशी पोचल्यानंतर त्यांना काही तरी आठवते. परळीतील गाडीचा चालक कोठे आहे, याची विचारणा होते, त्याला अडवानींबरोबर फोटो काढून घ्यायचा असतो. इतर वेळेस व्हिडिओचित्रण करण्यास नकार देणारे अडवानी या चालकासोबत मात्र "एक्स्लुझिव्ह' फोटो काढून देतात. चालक संकोचाने काहीसा दूर थांबतो, तेव्हा सहजपणे खांद्यावर हात टाकून त्याला ते जवळ घेतात. पुन्हा एकदा लातूरचा विमानतळ येतो. या वेळेस तेथे मोजके पोलिस असतात. विमान तयार होईपर्यंत नीरव शांतता असलेल्या विश्रामगृहात ते काही काळ थांबतात. उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना आणि शिपायांना विचारणा केली जाते. तितक्यात त्यांचे स्वीय सहायक दीपक चोपडा जवळ येतात. 1996मध्ये याच विमानतळावर हेलिकॉप्टरमधून उतरलो तेव्हा प्रचंड पाऊस पडत होता आणि न्यायला कोणीच आले नव्हते, याची आठवण एकमेकाला करून देतात. तेव्हा या इमारतीमध्ये दिवे लागत नव्हते, असेही ते सांगतात. योगायोगाने आजही वीज नसतेच. अडवानी खळाळून हसत, या योगायोगाला "दाद' देतात. पुन्हा प्रवासात मात्र स्वतःहून बोलायला प्रारंभ करतात. काही अधिकृत, काही अनधिकृत उत्तरे देतात. शरद पवारांपासून ते काश्मीरपर्यंत आणि पाकिस्तानपासून ते अयोध्येपर्यंत अनेक प्रश्नांना ते उत्तरे देतात. प्रवास संपतो. मुंबईत सभेला जाण्यापूर्वी ते "तुम्ही आता कसे जाणार,' असे विचारतात. पुण्याकडे निघणार म्हणताच, "कॉपी कहॉं से फाईल करोगे?' अशीही विचारणा होतेच. पुण्यात जाऊन करणार असे सांगताच, "जायला किती वेळ लागतो,' असे विचारतात. मग शिवसेना-भाजप युतीने बांधलेला एक्स्प्रेस वे त्यांना आठवतो. "अब तो बहोत देर नही लगती होगी,' असा प्रश्नही विचारतात. "अगली बार पूना को हायवे से ही आउंगा,' असे म्हणत, त्यांचा ताफा सभेकडे रवाना होतो. ----
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment