Friday, November 9, 2007

"अस्वस्थ' भुजबळ


राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ गेले काही दिवस पुन्हा चर्चेमध्ये आले आहेत. भुजबळ राजकीय भूकंप घडविणार, अशी चर्चा सुरू झाली आणि भूकंप व्यवस्थापनाची आपल्याला सवय आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केल्याने, भुजबळ खरोखरीच भूकंप घडविणार असा अंदाजही बांधण्यात येऊ लागला. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनीही, भुजबळ काय करणार याचा अंदाज जाहीरपणे सांगून या गोंधळात भर पाडली. या सर्वांमध्ये भुजबळ अजूनही स्पष्टपणे बोललेले नाहीत. किंबहुना ते देखील या सर्व परिस्थितीचा अंदाज घेण्यामध्येच मग्न आहेत.अर्थात अशा प्रकारचे वातावरण त्यांच्यासाठी नवीन नाही. राजकीय जीवनामध्ये यापूर्वी अनेकदा त्यांनी असे वातावरण अनुभवले आहे. एखादी वेळ सोडली, तर त्यापैकी प्रत्येक वेळेस ते यातून सहीसलामत बाहेर पडले आहेत. किंबहुना, प्रत्येक वेळेस भुजबळांनी या निमित्ताने वरची पायरीच चढली आहे. पुन्हा एकदा या वातावरणातून अशीच काही संधी मिळते का, याबाबत ते सध्या चाचपणी करीत आहेत. भुजबळांनी अशी अस्वस्थता या पूर्वी किमान तीन-चार वेळा अनुभवली आहे. गावाकडून मुंबईत दाखल झाले त्या वेळेस ते असेच अस्वस्थ होते. पदरात अभियांत्रिकीची पदविका असली, तरीही मिळालेल्या नोकरीमध्ये जीव रमत नव्हता. टायर रिमोल्डिंगसारखा स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यानंतरही मनामध्ये आणखी काही तरी करून दाखविण्याची धडपड होती. आपल्या समाजबांधवांसाठी काही तरी केले पाहिजे, यासाठी ते धडपडत होते. त्या काळामध्ये अशा धडपडीला आश्रय देणारी दोनच स्थाने होती, ती म्हणजे बाळासाहेब ठाकऱ्यांची शिवसेना आणि कामगार चळवळीत जोम धरू पाहणारी लाल निशाण चळवळ. आक्रमक भुजबळांना आपल्यासारखीच आक्रमक अशी बाळासाहेबांची शैली अधिक भावली. ते शिवसेनेत दाखल झाले. शिवसेनेचे वातावरण त्यांच्यातील अस्वस्थता दूर करणारे होते. किंबहुना कोणताही वेगळा विचार करण्याच्या फंदात भुजबळ पडलेच नाहीत. बाळासाहेबांच्याही ते अगदी जवळ गेले. 1975मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकल्यानंतर बाळासाहेबांची पहिली निवड भुजबळ हीच होती. त्यानंतर बघता बघता मुंबईमध्ये शिवसेनेने पाय रोवले. विस्तार वेगाने वाढला. ठाकरे यांना राज्यामध्ये संघटना नेण्याचे स्वप्न दिसू लागले. त्यामध्येही भुजबळ आघाडीवर होते. आक्रमक भाषणे करीत त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात सभा जिंकण्यास प्रारंभ केला.इकडे देशामध्ये मंडल आयोगाचे वारे वाहू लागले होते. त्याच वेळेस भुजबळ पुन्हा एकदा अस्वस्थ होते. शिवसेनेमध्ये आपल्या ताकदीला मर्यादा येत असल्याची जाणीव त्यांना अस्वस्थ करीत होती. महाराष्ट्रातील अन्य मागासवर्गीयांची संख्या त्यांच्या या अस्वस्थतेला अनुकूल साथ देत होती. ते "कार्ड' खेळायचे, तर शिवसेनेत राहून चालणार नाही, हे त्यांनी ओळखले होते. त्याच वेळेस मंडल आयोगाच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी जोरदार समर्थन एकत्र करण्यास सुरवात केली. दुसरीकडे, भुजबळांची ही गणिते कोणत्या दिशेने जाणार, याची बाळासाहेब ठाकरे यांनाही जाणीव झाली. त्यांनी भुजबळांवर थेट हल्लाबोल केल्यानंतर नागपूरच्या विधानसभेच्या अधिवेशनात भुजबळांनी कॉंग्रेसचा रस्ता धरताना शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली. महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाला वेगळे वळण देणारी ती घटना होती.त्यानंतर चार वर्षे भुजबळ मंत्री राहिले. मात्र, या काळामध्ये ते जुळवाजुळव करीत राहिले. 1995मध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये सत्तेवर आला आणि भुजबळांना माजगावमध्ये पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला. कॉंग्रेसने त्यांना विधान परिषदेवर पाठविल्यानंतर ते पुन्हा आक्रमक झाले. विधिमंडळात कॉंग्रेसकडून धडाडणारी ती एकमेव तोफ होती. पुढे शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांना साथ देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1999मध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यानंतर पवार यांनी भुजबळ यांना उपमुख्यमंत्रिपदी बसविले, तेव्हा सर्वांनाच काहीसा धक्का बसला. निवडणुकीच्या प्रचारामध्ये भुजबळ हेच आक्रमक नेते होते. तरीही मराठा समाजालाच राष्ट्रवादी कॉंग्रेस प्राधान्य देईल अशी चर्चा असतानाच भुजबळांची निवड भुवया उंचावणारी होती. उपमुख्यमंत्रिपदी आल्यानंतर गृह विभाग सांभाळताना त्यांनी आपली प्रशासकीय गुणवत्ताही सिद्ध केली. मात्र, याच काळात तेलगी प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू झाली. एका वाहिनीच्या कार्यालयावर त्यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याच्या प्रकाराची जबाबदारी घेऊन भुजबळ यांनी राजीनामा दिला खरा, पण त्यांची अस्वस्थता आणखी वाढली.तीन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विधानसभेवर जाण्यामध्ये यश मिळविले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यांना मिळणारे महत्त्व वेगाने कमी होत असल्याची भावना त्यांच्या मनात याच दरम्यान झाली. त्यांनी काही जणांशी ते बोलूनही दाखविले. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा संघटन सुरू केले. या वेळेस त्यांच्या अस्वस्थतेतून राष्ट्रीय पातळीवर काहीतरी करून दाखविण्याची इच्छा व्यक्त होत होती. दिल्लीमध्ये त्यांनी इतर मागासवर्गीयांचा मेळावा घेऊन आपली ताकद दाखवून दिली. त्यातूनच अनेक प्रश्‍नही निर्माण झाले. भुजबळ त्यांची उत्तरे जाहीरपणे देण्याचे टाळत असल्याने हे गूढ आणखी वाढते आहे. विशेष करून बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती मुंबईमध्ये येत्या महिन्यात आपल्या पक्षाचे शक्तिप्रदर्शन करीत आहेत. भुजबळ त्या व्यासपीठावर जाऊन आपल्या ताकदीची जोड त्यांना देणार, की राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा एकदा त्यांना मानाचे पान देऊन त्यांच्या ताकदीचा उपयोग स्वतःसाठी करून घेणार, याचे उत्तर लवकरच मिळेल. तोपर्यंत तरी भुजबळ अस्वस्थच राहणार आहेत.
---------------------पराग करंदीकर